माझे गाव

प्रत्येक गावाची ओळख त्याच्या नावामुळेच निर्माण होत असते. त्याचप्रमाणे माझ्या गावाचे नाव वढव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात वसलेले हे एक छोटेसे खेडेगाव आहे. लोणार–रिसोड या मुख्य रस्त्यालगत हे गाव वसलेले आहे. सपाट प्रदेशात वसलेले असल्यामुळे गावाला डोंगररांगा, मोठे तलाव किंवा धरणांचा नैसर्गिक लाभ मिळालेला नाही.

सुमारे एक हजार ते बाराशे घरांचे हे गाव चार ते साडेचार हजार लोकसंख्येचे आहे. आजही गावात काही जुनी कौलारू, मातीची, माडी किंवा माळवदाची घरे पाहायला मिळतात. काही कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीनुसार तुराच्या काड्यांपासून तयार केलेल्या कुडाच्या भिंती असलेली घरेही दिसून येतात. ही साधी घरे उन्हापासून संरक्षण देत आपल्या कुटुंबाला आधार देतात.

पूर्वीच्या सामाजिक रचनेनुसार गावात विविध समाजांच्या स्वतंत्र वस्त्या होत्या. खालच्या बाजूस मांगवाडा आणि महारवाडा, तर वरच्या बाजूस पाटील आणि इतर समाजांची वस्ती होती. काळाच्या ओघात मात्र समाजजीवनात मोठा बदल झाला आहे. आज गावात जातिभेदाला फारसे स्थान नाही. गावातील लोक एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतात आणि परस्परांशी बंधुभावाने व एकोप्याने राहतात.

गावातून तालुक्याच्या ठिकाणी जाणारा डांबरी रस्ता गेल्यामुळे वाहतुकीची सोय झाली आहे. या रस्त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा थांबा असल्याने गावकरी त्याला बसस्थानक म्हणतात. बस नेहमी वेळेवर येत नसली, तरी तिच्या येण्याची एक ठरलेली वेळ असते.

बसस्थानकाजवळ अश्रुबा यांचे छोटेसे हॉटेल आहे. तेथे मुख्यतः चहाच मिळतो; परंतु त्या चहापेक्षाही अधिक रंगतदार असतात तेथील गप्पांचे फड. या हॉटेलमध्ये तरुणांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांचीच अधिक वर्दळ असते. काहीजण आपल्या तरुणपणातील आठवणी सांगतात, काही संसारातील अनुभव मांडतात, तर काही फक्त वेळ घालवण्यासाठी तेथे येतात. त्यांच्या गप्पांमधून गावाचा इतिहास, संस्कृती आणि जीवनानुभव यांचे जिवंत दर्शन घडते.

सकाळच्या कोंबड्याने पहिली बांग दिली की मी उठायचो आणि संध्याकाळी दूध काढायला गेलो की पुन्हा अश्रुबाच्या हॉटेलवर येत असे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत घडलेल्या अनेक विषयांवर तेथे चर्चा रंगत असे. काही गप्पा तरुणांना प्रेरणा देणाऱ्या असत; परंतु एक गोष्ट मात्र खरी की, अनेकांना बोलण्याची कला या अश्रुबाच्या हॉटेलनेच शिकवली.

हॉटेलला लागून किराणा दुकान होते. त्या दुकानाच्या शेजारीच लोखंडी पत्र्यांच्या चार भिंती उभारून एक हेअर सलून सुरू करण्यात आले होते. दुकानाला स्वतंत्र छप्पर नव्हते; कारण शेजारील लिंबाच्या झाडानेच त्या दुकानाला आपल्या सावलीचे छत्र दिले होते. बाहेर मोठ्या अक्षरांत “हेअर सलून” असे लिहिलेले होते; मात्र येथे केस कापण्यापेक्षा गप्पाच अधिक रंगत असत.

गावात घडलेल्या घटना, गावातील राजकारण, तरुणांच्या सोयरिकी, शेतीचे प्रश्न आणि इतर अनेक विषयांवर येथे चर्चा होत असे. गावातील बातम्या मिळवण्याचे हेच एक महत्त्वाचे केंद्र होते. कधीकधी असे वाटायचे की, गावाचे अनौपचारिक वृत्तपत्रच येथे चालते.

डांबरी रस्त्याच्या कडेला प्रवाशांच्या सोयीसाठी तीन-चार ऑटो आणि दोन जीप नेहमी उभ्या असत. ही वाहने गावकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी ने-आण करण्याचे काम करत. गाव रस्त्यालगत वसले असल्यामुळे त्याला दोन्ही बाजूंनी जोडणी लाभली होती.

गावात अनेक मंदिरे आहेत; मात्र त्यांपैकी एक मंदिर विशेष वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या सभोवताली तलाव असून त्या तलावाच्या मध्यभागी मंदिर उभारलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी पाण्यावर पूल बांधलेला आहे. मंदिराभोवती उभ्या असलेल्या दोन विशाल वडाच्या झाडांमुळे तेथील वातावरण नेहमीच शांत आणि प्रसन्न वाटते. गावातील कोणत्याही कोपऱ्यातून मंदिराचा कळस उन्हात चमकत असल्याचे दिसते.

गावाचा एक भाग जिल्हा परिषद शाळेने व्यापलेला आहे. शाळेची इमारत सुबक असून परिसरात सावलीची व फुलांची झाडे आहेत. त्यामुळे शाळा ही गावाची खरी शान आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

वसंत ऋतूतील पहिला पाऊस पडला की गावाची तहान जणू भागते. उन्हाळ्याने कोमेजलेल्या झाडांना पुन्हा कोवळी पालवी फुटते. घरांच्या अंगणातील प्राजक्ताच्या झाडांवर सकाळी फुलांचा सडा पडलेला असतो. जणू येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करण्यासाठीच निसर्गाने हा फुलांचा वर्षाव केलेला असतो.

गावाच्या सर्व बाजूंनी दाट हिरवळ पसरलेली असते. त्या हिरवाईतून वळणावळणाने जाणाऱ्या पायवाटा पाहिल्या की जणू एखाद्या सुंदर बागेने संपूर्ण गाव आपल्या कुशीत घेतले आहे, असे वाटते. वसंत ऋतूत तर गावाचे रूप अधिकच खुलून दिसते. चैत्र-वैशाखातील उन्हाचा तडाखा वाढू लागला की गावाला पाण्याची टंचाई जाणवू लागते. सपाट प्रदेशात वसलेले असल्यामुळे गावाजवळ नदी किंवा तलाव नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना विहिरींवरच अवलंबून राहावे लागते.

पूर्वीच्या काळी गावात समाजरचनेनुसार वेगवेगळ्या विहिरी होत्या. चांभारांची विहीर, मांगांची विहीर आणि महारांची विहीर अशा नावांनी त्या ओळखल्या जात. आज जातिभेद मानला जात नसला तरी या विहिरींची जुनी नावे मात्र अजूनही प्रचलित आहेत.

यांपैकी चांभारांची विहीर गावाच्या मध्यभागी होती. तिचे पाणी अतिशय गोड व पिण्यायोग्य असल्यामुळे गावातील बहुतेक कुटुंबे तेथूनच पाणी भरत असत. सकाळ-संध्याकाळ विहिरीवर पाण्याच्या घागरी, पोहरे आणि दोऱ्यांची लगबग सुरू असे. गावच्या सामाजिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग या विहिरीभोवती घडत असे.

मात्र या विहिरीशी काही अत्यंत दुःखद आठवणीही जोडलेल्या आहेत. संसारातील संकटे, गरिबी, कौटुंबिक कलह किंवा मानसिक ताण यांमुळे काही स्त्रियांनी या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या होत्या. अशा वेळी शेजारीपाजारी धावून येत आणि पोहता येणारे धाडसी युवक जीव धोक्यात घालून त्या महिलांना वाचवत असत. अशा घटनांमुळे काही दिवस गावात भीतीचे वातावरण निर्माण होत असे.

एकदा तर एक तरुणी पाणी भरताना अपघाताने विहिरीत पडली. दोरीला बांधलेला पोहरा वर ओढताना तिच्या साडीचा पदर लोखंडी आकड्यात अडकला आणि तिचा तोल गेला. ती पाण्यात पडताच उपस्थित लोक घाबरले. सुदैवाने काही धाडसी युवकांनी तात्काळ विहिरीत उडी मारून तिचे प्राण वाचवले.

या आणि अशा अनेक घटनांमुळे काही काळ गावातील लोकांनी त्या विहिरीचे पाणी वापरणे टाळले. परिणामी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या अधिक गंभीर बनत असे.

उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत गेला. ही परिस्थिती लक्षात घेऊन गावातील काही ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला. गावाला कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा, यासाठी उंच जागेवर मोठी पाण्याची टाकी उभारण्याची योजना आखण्यात आली. शासनाच्या आर्थिक योजनेतून या कामास मंजुरी मिळाली आणि पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू झाले.

बांधकामाच्या काळात अनेक अडचणी आल्या; निधीची कमतरता, कामातील विलंब आणि प्रशासकीय अडथळे यांमुळे काही काळ काम रखडले. मात्र गावकऱ्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर टाकीचे बांधकाम पूर्ण झाले आणि गावाला नियमित पाणीपुरवठा सुरू झाला. आज बसस्थानकाजवळ उभारलेल्या त्या दोन पाण्याच्या टाक्या गावाच्या प्रगतीची साक्ष देत उभ्या आहेत.

गावाने काळानुसार अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. शिक्षण, शेती, सामाजिक जाणीव आणि विकास या सर्वच क्षेत्रांत गावकऱ्यांनी उल्लेखनीय बदल घडवून आणले आहेत. तरीही गावाचा साधेपणा आणि आपुलकी आजही कायम आहे.

गावातील शेतकरी पहाटेपासून संध्याकाळपर्यंत शेतात कष्ट करत असतात. प्रत्येकजण आपल्या कामात मग्न असतो. मातीची घरे, सारवलेली अंगणे, अंगणातील तुळशीवृंदावन, घराभोवतीची झाडे आणि पक्ष्यांचा किलबिलाट यांमुळे गावाचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

गावाला आजही झाडांची साथ लाभलेली आहे. सकाळी उगवणारा सूर्य झाडांच्या फांद्यांतून डोकावताना दिसतो, तर सायंकाळी मावळणारा सूर्यही त्या हिरव्या झाडांच्या आडून निरोप घेतो. हे दृश्य मनाला विलक्षण आनंद देणारे असते.

प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे, “प्रत्येक गावाला माणसाप्रमाणे एक स्वभाव असतो.” माझ्या गावालाही तसाच एक वेगळा स्वभाव आहे. गावातील लोक मनाने कणखर, कष्टाळू, प्रेमळ आणि प्रसंगी भांडखोरही आहेत; परंतु संकटाच्या वेळी ते सर्व मतभेद विसरून एकमेकांच्या मदतीला धावून येतात. हाच या गावाचा खरा स्वभाव आहे.

या आपुलकीच्या, जिव्हाळ्याच्या आणि एकोप्याच्या बळावर वढव या छोट्याशा गावाने बुलढाणा जिल्ह्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जीवनातील खरे सुख, समाधान आणि माणुसकी यांचा अनुभव मला माझ्या गावातच मिळाला. त्यामुळे कितीही दूर गेलो, कितीही मोठ्या शहरात राहिलो, तरी माझ्या गावाची ओढ कधीही कमी होत नाही.

स्वर्गानंतर जर मला सर्वांत प्रिय असे कोणते ठिकाण वाटत असेल, तर ते म्हणजे माझे गाव. म्हणूनच अभिमानाने म्हणावेसे वाटते—

“माझे गाव, माझी ओळख; माझे गाव, माझा अभिमान.”

 

 

– नागेश वाठोरे 

वढव (बुलढाणा)

भ्रमणध्वनी – ८५५१८६८०५९

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top